सोलापूर : जिल्ह्यातील वांगी येथे आईने मानसिक तणावातून दोन गतिमंद मुलांसह ८० फूट खोल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृतांमध्ये २८ वर्षीय चित्रा कविराज हाके, ७ वर्षांचा पृथ्वीराज आणि दीड वर्षाचा स्वराज हाके यांचा समावेश आहे. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे.
सोलापुरात काळीज चिरणारी घटना घडली आहे. दोन्ही मुले गतिमंदच असल्याच्या चिंतेतून आईने त्या दोन्ही मुलांसह गावाजवळील ८० फूट खोल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी येथे बुधवारी 12 मार्च रोजी ही घटना घडली .चित्रा कविराज हाके (वय, २८), पृथ्वीराज हाके (वय, ७), स्वराज हाके (वय, दीड वर्षे) अशी मयतांची नावे आहेत.
हाके कुटुंबीय सोलापूर जिल्ह्यातील बार्शी रोडवरील मूळचे नान्नज येथील होते. कविराज उर्फ दत्तात्रेय हाके काही वर्षांपूर्वीच कुटुंबासह पत्नीच्या माहेरी वांगी येथे राहण्यास आले होते. त्यांना एक आठ वर्षाची मुलगी आहे. चित्रा यांची पृथ्वीराज व स्वराज अशी दोन मुले होती. पृथ्वराज हा जन्मतः गतिमंद होता. त्यानंतर स्वराज जन्माला आला. स्वराज देखील गतिमंदच जन्माला आला. दोन्ही पोरं गतिमंद जन्माला आल्याने चित्रा यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत होती. दोन्ही मुलं गतिमंद जन्माला आल्याने चित्रा हाके अनेक दिवसांपासून निराश होत्या.
चित्रा हाके यांनी चिंतेतून टोकाचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास गावाजवळील विहिरीत त्यांनी मुलांसोबत उडी घेतली. त्यावेळी विहिरीपासून काही अंतरावर शेळ्या चारणाऱ्या मुलीला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. शेळ्या चारणाऱ्या तरुणीने विहिरीकडे धाव घेतली. विहिरीलगत दाट झाडी असल्याने विहिरीपर्यंत जायला वेळ लागला. विहिरीत डोकावून पाहिल्यावर तीन वर्षाचा स्वराज पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सर्वांनीच विहिरीकडे धाव घेतली.
सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शोधण्यासाठी सोलापूर शहरातून अग्निशामक दलाचे पथक बोलावण्यात आले. या पथकाच्या सहाय्याने सायंकाळी सहाच्या सुमारास चित्रा यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले. चिमुकल्या स्वराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. मात्र, पृथ्वीराजचा मृतदेह उशिरापर्यंत सापडला नव्हता. सहायक पोलिस निरीक्षक कदम यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक महेश घोडके, शहाजी कांबळे व पोलिस हवालदार महिंद्रकर, मिस्त्री हे रात्रभर घटनास्थळी होते.